Skip to main content

शून्य गुंतवणुकीतून पोंभुरण्यातील महिला बचत गटाने उभारला मास्क निर्मितीचा व्यवसाय.

 सामान्यांतील  असामान्य सामाजिक उद्योजकांनी नेहमीच समाजासाठी प्रेरणादायी विचार आणि आचार ठेवला आहे. कोरोनामुळे लॉक डाऊन च्या काळात आपली सगळी अर्थव्यवस्था ठप्प झाली असताना आरोग्य व्यवस्थेशी संबंधित मास्क बनविण्याच्या महिला बचत गटाच्या पोंभूर्ना येथील सदस्यांचा  व्यवसाय नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

#आत्मविश्वास आणि जिद्दीच्या जोरावर शून्य गुंतवणुकीतून  पोंभूर्ण्यातील महिलांनी सुरू केला मास्क बनवण्याचा व्यवसाय.

कोरोनामुळे संपूर्ण भारतामध्ये हाहाकार माजला आहे.परिणामी भारतामधील सर्व उद्योगधंदे, गावातील छोटे-मोठे उद्योग व्यवसाय सगळे ठप्प पडले आहेत.भारताचे शेतीमाल प्रक्रिया आणि दैनंदिन वस्तू व्यतिरिक्त कुठलेही उत्पादन सुरू नाही. गेल्या चार  आठवड्यापासून संपूर्ण भारतामध्ये लॉक डाऊन चालू आहे आणि महाराष्ट्रमध्ये 3 मे पर्यंत लॉक डाऊन चालू राहणार आहे.
महाराष्ट्र हा विकसित भाग म्हणून भारतामध्ये आणि जगामध्ये ओळखला जातो. परंतु कोरोना या साथीच्या रोगामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. संपूर्ण वित्तीय बोजा हा आरोग्य यंत्रणेशी संलग्न सेवा पुरवणा-या  यंत्रणावरती खर्च होत आहे. जागतिक बँक तसेच केंद्र सरकारच्या वतीने होत असलेल्या आर्थिक मदतीने या परिस्थितीमध्ये सकारात्मक गोष्टी दिसून येत आहेत. सर्व यंत्रणांचे लक्ष केवळ कोरोना या आजारावर असताना इतर संपूर्ण  आर्थिक बाजूंवर महाराष्ट्राला आणि भारताला लक्ष देणं शक्य नाही. लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालला असून,आरोग्य यंत्रणांवर देखील ताण वाढत आहे.

सद्य परिस्थितीमध्ये आरोग्ययंत्रणा यांना मदत करण्यासाठी स्वयंसेवक पुढे येत आहे . त्यापैकीच एक नवोपक्रम म्हणावं असा कोरोना  या रोगावर  मात करण्यासाठी चंद्रपूर येथील पोंभुर्णा तालुक्यातील  दिघोरी गावातील बचत गटाने पुढाकार घेतला आहे. आर्थिक बाजू मजबूत करण्यासोबतच  कोरोना रोगाविषयी समाजामध्ये मास्क बनवून ते अल्प दरामध्ये विकून ते वापरण्याबद्दल जनजागृती करण्याचे काम दिघोरितील हे बचत गट करत आहे.
गावामध्ये काम करणारे ग्रामपरिवर्तक श्री.रवी  आहिरे यांच्या मार्गदर्शनातून  गावातील लोकांना अल्प किमतीमध्ये चांगल्या दर्जाचे मास्क बनवून देणे त्यासोबतच त्याबाबत जनजागृती करण्याचा विचार बचत गटाच्या सदस्यांनी बोलून दाखवला आणि सुरू झाला हा अनोखा प्रवास.
गावातील 4 महिला बचत गट एकत्र आले. अंबिका,गौरी,जय अंबे आणि लक्ष्मी माता महिला बचत गटाच्या सदस्यांनी एकत्र येवुन मास्क बनविण्यास तयार असल्याचं   सांगितले आणि लागलीच काम सुरू झाले. महाराष्ट्र ग्रामीण जीनोन्नती तालुका अभियान कक्षाकडून देखील याची दखल घेऊन त्यांनी या बचत गटाला कापड पुरविणे आणि त्याचे शेजारील गावात विक्री व्यवस्थापनासाठी सहकार्य लाभले.कोणत्याही गुंतवणुकीशिवाय  केवळ काही दिवसात 4 महिला गटातील सदस्यांनी मिळून 1800 मास्क बनवून ते   विकले.त्यापैकी 530 मास्क हे गावातच विकले गेले. हाती काहीही नसताना केवळ आत्मविश्वास आणि जिद्दीच्या
जोरावर या महिलांनी चांगली सुरुवात केली.सध्या उमेद मार्फत विक्री व्यवस्थापनासाठी काम चालू आहे.
सर्वात महत्वाचे म्हणजे मास्क कसे बनवावे याबाबतचे तांत्रिक मार्गदर्शन आनंदवन येथील व्यवस्थापकीय संचालक डॉ.शीतल आमटे यांनी केले.
मंगला सोनटक्के या उपक्रमाविषयी बोलताना सांगतात की," या कठीण दिवसात  उपजिविकेसाठी काय करावे हा मोठा प्रश्न होता. परंतु मास्क बनवून देण्यामुळे घरात बसून रोजगार उपलब्ध झाला आहेच त्याबरोबरच कोरोना रोगाशी लढण्याचं आणि जनजागृती करण्याचं देखील काम करत आहे."
श्री.रवी अहिरे  जे दिघोरी ग्रामपंचायत येथे ग्रामपरीवर्तक म्हणून काम करतात. ते बोलताना सांगतात की,"महिला बचत गटाकडून चालवले जाणारे हे काम आणि  त्यांची जिद्द खरंच कौतुकास्पद आहे."
उमेद अभियानाचे तालुका व्यवस्थापक श्री. सराळे सर आणि ग्रामपरीवर्तक श्री.रवी अहिरे यांच्या मार्गदर्शनातून सुरू झालेलं हा नवोपक्रम आजच्या कठीण प्रसंगात बचत गटाच्या महिलांच्या जिद्दिमुळे आणि चिकाटीमूळे 10-12  घरांना  आर्थिक  उभारी देऊन त्यांना सक्षम करत आहे. सदर उपक्रमाविषयी अधिक माहितीसाठी श्री.रवी अहिरे,9422448281 या क्रमांकावर संपर्क साधू शकता.
शब्दांकन-
अतुल संगीता आत्माराम.
9527544478




Comments

  1. हे प्रेरणा आणि बळ देणारं काम आहे. संकटाच्या काळात मोलाचे योगदान ठरणार आहे. अभिनंदन ग्राम परिवर्तक रवी अहिरे आणि सर्व बचत गटातील महिला यांचे आभार.

    ReplyDelete
  2. खूपच प्रेरणादायी उपक्रम...स्वतःच्या उपजीविकासोबतच समाजाची खूप चांगल्या प्रकारे सेवा घडत आहे.

    ReplyDelete
  3. हे खरोखर छान आहे ... सर्व शुभेच्छा ❤

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

' घनकचरा व्यवस्थापनातून गुणवत्तापूर्ण शिक्षण संसाधने आणि विकास ' तुम्हाला जर मी एक प्रश्न  विचारला की ,जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेबद्दलची तुमची कल्पना काय तर तुम्ही काय उत्तर देणार? माझा मित्र अनिकेत आणि त्याच्यासारखे कित्येक जण असं म्हणतात की, मराठी शाळा चांगल्या आहेत, वातावरण चांगलं आहे,जागा भरपूर आहे पण शाळेसाठी इन्फ्रास्ट्रक्चर नाहीय.शाळेकडे कोणी लक्ष देणार नाहीय.संसाधनांची उपलब्धता आणि वापर याचा अभाव आहे.माझ्या पुन्हा प्रश्न आहे की, सगळीकडेच हेच पाहायला मिळत आहे का? आणि बहुतांशी  मला मिळालेली उत्तरे हीदेखील नकारार्थीच आहेत. आज ग्रामीण भागातील प्रत्येक पालकाला इंग्रजी माध्यमाच्या शालाबद्दल खूप अप्रूप आहे.इंग्रजी शाळेत माझं पोरग गेलं म्हणजे सगळी शिक्षणाची उच्च सुविधा आपल्या पोराला उपलब्ध होणार असा त्यांचा भ्रम! माझ्या पोराला एवढी 'जास्त फी -तेवढी हजार फी ' यावरच शिक्षणाची तुलना होऊ लागली आहे.पण त्या शाळांतील शिक्षणातून दर्जात्मक,गुणात्मक शिक्षण दिलं जात आहे का,आपला मुलगा भविष्यात  जागतिक स्पर्धेला  दोन हात करण्यासाठी समर्थ होईल का हे नाही समजत! श...
स्वच्छतेतून -वैचारिक स्वच्छतेकडे’ PC:www.wildfilmindia.com (देशाचे  मा.पंतप्रधान स्वच्छतेवर खूपच आक्रमक असून नेहमीच त्याबाबत कोणत्या न कोणत्या नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात व्यस्त असतात.हा लेख लिहिण्याचं प्रयत्न मा.पंतप्रधान आणि त्यांच्या स्वच्छताविषयक योजना आणि विचारांनी प्रेरित होऊन खऱ्या अर्थाने ‘स्वच्छता दूत’ असणाऱ्या माझ्या साऱ्या भारतातील माता भगिनींना समर्पित. #’स्वच्छतेतून -वैचारिक स्वच्छतेकडे’# मी सायंकाळी  गॅलरीमध्ये चहा पीत  उभा होतो आणि माझी नजर गलरीमधून सायंकाळच्या होणाऱ्या हालचाली टिपण्यात व्यस्त होती.समोरील एका घरासमोर एक मुलगी अंगण झाडत होती.आणि समोरच्या नालीवर काही तळीराम चार्जिंग होऊन बसले होते.मी मात्र ते दृश्य पाहून स्वच्छतेच्या विचारात व्यस्त झालो. बसलेल्या तळीराम फालतू गोष्टी करण्यासोबतच त्या मुलीकडे पाहून एकमेकांना खुणावत होते.ती मुलगी हाताने झाडू घेऊन झाडत होती आणि दुसऱ्या हाताने आपली इज्जत वर तळीरामच्या नजरेतून वाचवण्यासाठी संघर्ष करत होती.बाजूच्याच दुकानात टीव्हीवर नुकताच मा.देशाच्या पंतप्रधान कडून झालेल्या ‘मन की बात’ वर चर्चा चालू होती.मा....

घनकचरा व्यवस्थापनाचा सुप्त किडा

 टाटा इन्स्टिट्यूट मधून पाणी,स्वछता आणि आरोग्य व्यवस्थापन विषयात पदवी घेऊन  मी युनिसेफ संस्थेसाठी काम करत आहे.जेव्हापासून मी WASH कोर्सला प्रवेश घेतलंय, तेव्हापासून जिथं कुठं  मला घनकचरा दिसतोय-तेव्हा माझ्यातील सुप्त किडा मला नेहमीच आव्हान करत होता. "अरे अतुल,एवढा तुझ्यासमोर कचरा दिसतोय आणि तू काहीच करत नाहीयेस ?" असं बोलल्याप्रमाणे तो मला जणू शह देत होता. माझ्यासह अखिल मानवजात त्यांच्या दैनंदिन जीवनात कोट्यवधी किलोचा कचरा निर्माण करून पृथ्वीवर साठवत आहे.आणि फार कमी लोक त्याच्या व्यवस्थापणासाठी काम करत आहेत.  मी यवतमाळ येथील उमरी गावातील एका संस्थेत मागच्या एक आठवड्यापासून मुक्कामी आहे.येण्याचं प्रयोजन म्हणजे घनकचरा व्यवस्थापन. अभियांत्रिकी आणि सामाजिक विज्ञान शास्त्रातील माझ्या पदवीचा उपयोग या ठिकाणी पुरेपूर करून शिक्षण,पोषण आणि पर्यावरण विषयात दखलपात्र काम करता येऊ शकतं का ? याचाच मला अनुभव घ्यायचं आहे. इथे खचाखच भरून असणारा कचरा मला जास्तच अनुभव देत आहे.अगदी निर्जीव गोष्टीदेखील तुम्हाला शिकवत असतात त्याप्रमाणे!  येणाऱ्या काही दिवसांत यावर काय काय फलनिष्पत्ती ...